मुंबई :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील बारवी धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आलेली आहे. या धरणात बुडीत होत असलेली अतिरिक्त 61 हेक्टर जमिन संपादित करण्यात येऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत सांगितले.
बारवी धरणातील संपादित जमिनी बाबत सदस्य किसान कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, बारवी धरणाच्या टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन मधील 203 प्रकल्प बाधितांना सेवेत सामावून घेण्यासाठी एमआयडीसी तसेच महानगरपालिकांमध्ये प्रयत्न केले जातील. या प्रकल्पातील १२०४ पैकी ५७८ प्रकल्पबाधितांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणी वापराच्या समन्वय तत्वावर सामावून घेतले आहे.