– देऊळगाव वळसा येथील कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरू ठरली आकर्षण
दारव्हा :- जिल्ह्यातील विविध तीर्थस्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता तीर्थस्थळांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. तीर्थस्थळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दारव्हा तालुक्यातील देऊळगाव (वळसा) येथे महालक्ष्मी महोत्सवानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दीड कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू, मातोश्री महिला सखी मंडळाच्या अध्यक्ष शीतल राठोड, युवती सेनेच्या विदर्भ निरीक्षक दामिनी राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, जीवन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाष राठोड, उपसभापती सुशांत इंगोले, सरपंच योगिता राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले, दिग्रस, दारव्हा, नेर मतदारसंघात भाविकांची मोठी श्रद्धा असणारी तीर्थस्थळे आहेत. परंतु अनेक ठिकाणी सुविधा नसल्याने भाविकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेवून आपण तीर्थस्थळांच्या विकासकामांना प्राधान्य दिले. धामणगाव (देव), देऊळगाव (वळसा), मानकी, कोलवाई, माणिकवाडा, खोंड्या बरड आदींसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. भविष्यात देखील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. यावेळी जीवन पाटील यांनीही विचार मांडले. संचालन प्रा. किशोर राठोड यांनी केले. कार्यक्रमाला संस्थानचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्याने विदर्भातील एकमेव महालक्ष्मी मंदिर असलेल्या देऊळगाव वळसा येथे तीन दिवस चाललेल्या यात्रा महोत्सवाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी भाविकांनी महालक्षी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादासह ठेवण्यात आला होता. संस्थानसह ग्रामपंचायत, गावातील नागरिकांनी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. विविध ठिकाणांहून भाविकांकरिता मोफत प्रवासाची सोय करण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
आर्ची म्हणली, इंग्लिशमध्ये समजत नाही का?
यावर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरुने गाजलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील ‘इंग्लिशमध्ये समजत नाही का, मराठीत सांगू?’, हा संवाद यावेळी म्हटला. आर्चीच्या या संवादावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आलीं. यावेळी रिंकू राजगुरू उपस्थित होती. त्यानंतर पार पडलेल्या विविध विकासकामांच्या सोहळ्यात देखील तिने हजेरी लावली. रिंकूला बघण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.