नागपूर :- संविधान हातात घेऊन ‘संविधान खतरे में हैं’ची बतावणी करीत दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची दिशाभूल करून सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न असो किंवा देशातील दलित आणि आदिवासींना कसा धोका आहे, हे संभ्रमित करून पटवून देणे असो, अशा अनेक कृती मागील अनेक महिन्यांत राहुल गांधींनी केल्या. मात्र ज्यांच्या रक्तातच दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा तिरस्कार आहे, त्यांचे सत्य जास्त काळ लपून राहू शकत नाही. शेवटी जी काँग्रेसची नियत आहे ती आज जगापुढे आली आणि राहुल गांधींनी आरक्षण रद्द करण्याचा त्यांचा मनसुबा जगापुढे मांडला. अखेर राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी षडयंत्राचा बुरखा फाटला, अशी घणाघाती टिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला.
वॉशिंग्टन डीसी मध्ये जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना राहुल गांधींनी ‘जेव्हा भारत योग्य ठिकाणी असेल तेव्हा त्यांचा पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल’, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा ॲड. मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.
राहुल गांधी यांचा वॉशिंग्टन डीसी चा दौरा व कार्यक्रम इंडीयन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी तयार केलेला आहे. यापूर्वी सॅम पित्रोदा यांनी देखील भारतीय संविधानाचे श्रेय सर्वस्वी पंडित नेहरुंचे आहे असे सांगताना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साधा उल्लेख देखील टाळला होता, ही त्यांची बाबासाहेबांच्या प्रति असलेली घृणा अधोरेखित होते. त्याच मानसिकतेतून आज राहुल गांधींनी हे वक्तव्य केल्याचेही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नमूद केले.
देशात सर्वाधिक काळ काँग्रेसने सत्ता भोगली. मात्र नेहमीच काँग्रेस सरकार ही आरक्षणाच्या विरोधात राहिलेली दिसून येते. सर्वाधिक काळ सत्तेत राहूनही मागासवर्गीयांचे आरक्षण लागू न करणे, जातीगत जनगणना करण्यापासून पळ काढणारा काँग्रेस पक्ष आज मात्र दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या जीवावर सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. आता यापुढे विदेशात जाऊन राहुल गांधींनी त्यांच्या मनसूब्याचे दर्शनच घडविले आहे. राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसकडून आरक्षण संपविण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपाचा पुरावा आहे. एकीकडे संविधान वाचविण्याचा नारा देउन देशातील दलित, आदिवासी आणि मागासवर्गींना भ्रमीत करण्याचे कारस्थान राहुल गांधींनी केले आहे. आता त्याच भावनिकतेच्या आधारावर ते आरक्षण रद्द करण्याचे जाहिर वक्तव्य करीत आहेत, हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे, असे सांगत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निषेध व्यक्त केला.
इतिहासाकडे डोकावून पाहिले तर काँग्रेसचे आरक्षण विरोधी विचार आणि धोरण स्पष्टपणे दिसून येतात. काँग्रेसच्याच सरकारमध्ये असताना आरक्षणाचा कोटा पूर्ण न केल्याने संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, हे सर्वश्रुत आहे. आज त्याच बाबासाहेबांचे नाव घेउन देशाची सत्ता काबिज करण्याचे कारस्थान काँग्रेस आणि राहुल गांधींनी रचले होते. मात्र जनता जनार्दनाने त्यांचे मनसूबे हानून पाडले आणि संविधानासोबतच आरक्षणाचा देखील बचाव केला, असे ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
काँग्रेस आणि राहुल गांधींची ही आरक्षणविरोधी विखारी भूमिका देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी मारक आहे. हे आता जनतेला देखील कळून चुकले आहे. त्यामुळे आता येत्या काळात जनताच आरक्षण विरोधी बाता करणा-या काँग्रेस आणि राहुल गांधींना इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.