यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहिर केली आहे. त्यानुसार दि.26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पाडण्यासाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
या आदेशानुसार दि.26 एप्रिल रोजी मतदान केंद्र परिसरात जमाव करण्यास, मतदारांना बळजबरीने मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास प्रवृत्त करणे, उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचे प्रदर्शन करणे, मोबईल फोन, कॅार्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट व इतर ईलेक्ट्रॅानिक उपकरणांचा वापर करून वाहनाचा मतदान केंद्रामध्ये अनधिकृत प्रवेश यावर बंदी राहील.
यासोबतच 100 मिटर परिघाच्या आत मतदान केंद्र परिसर म्हणून वर्णन केलेल्या मतदान केंद्राच्या परिसरात आणि मतदान मंडपामध्ये भ्रमरध्वनी, तारविहरीत दुरध्वनी, बिनतारी संदेश संच इत्यादी बाळगण्यास किंवा वापरण्यास कोणत्याही व्यक्तीला मुभा नाही. केवळ निवडणूक निरिक्षक, सुक्ष्म निरिक्षक, मतदान केंद्राध्यक्ष व सुरक्षा कर्मचारी यांनाच भ्रमरध्वनी बाळगण्यास मुभा आहे. त्यांचे भ्रमरध्वनी देखील सायलेंट मोडवर ठेवणे आवश्यक आहे. मतदानाच्या अनुषंगाने घरोघरी जाऊन प्रचार करण्यास मुभा असणार आहे, परंतू एकावेळी पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव कुठेही करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी आदेशात नमुद केले आहे.