-विविध योजनांच्या माध्यमातून हातभार लावा
-सौर पंपाच्या अटी -शर्थी बाबत पुनर्विचार करणार
नागपूर : नागपूर ग्रामीण भागात झालेल्या गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संवेदनशीलतेने मदत करा. राज्य शासनाच्या विविध योजनेतून त्यांना मदत मिळेल, असे नियोजन करा. पंचनामे पुढील दोन दिवसात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे उर्जा तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, रामटेक, नागपूर ग्रामीण या भागात पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दौरा केला. तर आजच पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी रामटेक तालुक्यामध्ये दौरा केला. या दौऱ्यावरून परत आल्यानंतर डॉ.नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाभरातील पंचनामे, पिक विमा नुकसान तसेच वीज कंपन्यांकडून झालेले सर्वेक्षण याबाबतचा आढावा घेतला.
या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, विद्युत कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दौरा करताना सौर पंप संदर्भातील अटीशर्तीमुळे काही ठिकाणी पाण्याचा उपसा संदर्भात शेतकऱ्यांना अडचण जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वीज पंपाच्या क्षमतेसंदर्भात या भागातील अटी-शर्ती शिथिल करता येतील का या संदर्भात अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नुकसान भरपाई देताना कोणाचे नुकसान होणार नाही. मात्र चुकीचे लोकही यादीत येणार नाही, यासाठी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर यादी लावण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पीक विमा काढलेला आहे व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी तात्काळ पिक विमा कंपन्यांकडे व कृषी विभागाकडे अर्ज करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सर्वांना सूचना पाठवण्याचे त्यांनी निर्देशित केले.
पारशिवनी परिसरातील पंचनामे प्रलंबित असल्याचे लक्षात आले. पुढील दोन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण झाले पाहिजे अशी कालमर्यादा त्यांनी यावेळी स्पष्ट केली.