नागपूर :- स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.२१) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Committee) बैठक पार पडली.
बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यपिका डॉ. शर्मिला राऊत, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलींद सुर्यवंशी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यपिका डॉ. भाग्यश्री वानखेडे, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.
स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
या बैठकीमध्ये नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयित स्वाईन फ्लू रुग्ण व त्यातील बाधित या सर्वांचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर एकूण ४ स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता ४ मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले. यात नागपूर ग्रामिण भागातील १ रुग्णाचा मृत्यू झालेला असून तो स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच एक चंद्रपूर जिल्ह्यातील असून, इतर २ मृत्यू हे मध्यप्रदेश येथील असल्याचे निष्पन्न झाले.
५६६ रुग्ण स्वाईन फ्लू मुक्त
नागपूर शहरात आतापर्यंत ६४७ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यात आतापर्यंत मनपा हद्दीतील १९, जिल्हा क्षेत्रातील ९, नागपूर जिल्ह्याबाहेरील १८ आणि इतर राज्यातील १४ असे एकूण ६० रुग्ण स्वाईन फ्लू मुळे मृत्यूमुखी पडले आहे. स्वाईन फ्लू बाधित रुग्णांपैकी नागपूर शहरातील ३५०, नागपूर ग्रामिण मधील ११३ आणि जिल्ह्याबाहेरीत १८४ अशा एकूण ६४७ स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद आहे. तसेच ५६६ रुग्ण स्वाईन फ्लू ला हरवून सुखरूप घरी पोहोचणे ही सुखद बाब असून वेळीच सतर्कता दाखवून वैद्यकीय उपचार घेतल्यास स्वाईन फ्लू वर मात करणे शक्य आहे.
सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.