नौवहन क्षेत्राने प्रगतीसोहब सागरी पर्यावरण संरक्षणाशी समतोल साधावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

मुंबई :- जागतिक व्यापार वाढत असताना नौवहन क्षेत्र प्रगती करीत आहे. ही प्रगती होत असताना सागरी पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक गांभीर्याने विचार करतील असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ व्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषद (इनमार्को २०२२) व प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई येथे गुरुवारी (दि. १७) संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसांच्या परिषदेचे आयोजन भारतीय नौवहन महासंचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनीअर्स (इंडिया) या संस्थांनी केले आहे.

ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन ही जागतिक समस्या असून या उत्सर्जनाचे प्रमाण कालबद्ध पद्धतीने कमी व्हावे या दृष्टीने नौवहन क्षेत्राने विचारविनिमय सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी नौवहन संचालनालय व इन्स्टिट्यूट ऑफ मरिन इंजिनिअर्सचे अभिनंदन केले.

नौवहन क्षेत्राच्या माध्यमातून होणारे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन ४० टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून या दृष्टीने सर्व संबंधित क्षेत्रांमध्ये सहकार्य अपेक्षित आहे असे नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सागरी पर्यावरण विभागाचे संचालक आर्सेनिओ डॉमिनगेझ यांचे बीजभाषण झाले.

दर चार वर्षांनी होणाऱ्या या परिषदेच्या उदघाटन सोहळ्याला इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनिअर्स (इंडिया) मुंबई शाखेचे अध्यक्ष अरुण कुमार गुप्ता, इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनिअर्सचे अध्यक्ष विजेंद्र कुमार जैन, परिषदेचे अध्यक्ष राजीव नय्यर व निमंत्रक डेव्हिड बिरवाडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या त्रिदिवसीय परिषदेचा मुख्य विषय ‘शाश्वत भविष्यासाठी हरित सागरी विश्व’ हा असून नौवहन उद्योगाशी निगडित विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था व तज्ज्ञ परिषदेत सहभागी होत आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार उमेदवारांना रोजगार - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Sat Nov 19 , 2022
मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights