संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 24 सप्टेंबर 2022 रोजी सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस ‘ प्रचंड विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमाला जवळपास 200 च्या वर विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेणू तिवारी अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती हे होते. कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. राष्ट्रपाल मेश्राम सहयोगी प्राध्यापक आणि विभागप्रमुख समाजकार्य महाविद्यालय कामठी हे उपस्थित होते. सोबतच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे आणि लेडी ऑफिसर डॉ. निशिता अंबादे ह्या सुद्धा विचार पीठावर उपस्थित होत्या. राष्ट्रीय सेवा योजना या विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्य कशापद्धतीने रुजली पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
तर कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रनिर्माणासाठी तरुण वर्ग हा कसा आवश्यक आहे. त्यांच्यामुळे राष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडत असतो. याबद्दल सविस्तर असे विवेचन करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळामध्ये लोकांची सेवा कशा पद्धतीने केली याबद्दल नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण देऊन सेवाभाव समजावून दिला. त्यामध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या काळामध्ये लोकांची सेवा स्वतः मृत्यू पत्करुन कशी केली यांचे अतिशय मार्मिक असे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले . या योजनेमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवेचे व्रत या ठिकाणी स्वीकारले पाहिजे. अशी इच्छा व्यक्त केली.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.रेणू तिवारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ‘मी नाही तर तुम्ही ‘ हा भाव विद्यार्थ्यामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला. शिवाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाजामध्ये कार्य करण्याची वृत्ती उदंड प्रमाणात असायला हवी तरच ते समाजामध्ये चांगले कार्य करू शकतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जोगी यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. निशिता अंबादे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. इफ्तेखार हुसेन,डॉ. दीपक भावसागर, डॉ. राजेश पराते, डॉ. मंजिरी नागमोते, डॉ. अझहर अब्रार ही प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. ह्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड होता.