बुद्ध आणि आंबेडकरांचे विचारच समाजाला दिशादर्शक – अशोक बागुल
वाडी :- अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने दाभा येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात भदंत संघकीर्ती थेरो यांच्या आयोजनात सम्पन्न वर्षावासाची समाप्ती एका विशेष कार्यक्रमाने संपन्न झाली.
सर्वप्रथम भिख्खू संघाच्या उपस्थितीत उपासक-उपासिकांनी सकाळी महापरित्राण पाठ व बुद्ध वंदना ग्रहण केली. तद्नंतर भिख्खू संघाला भोजनदाना नंतर उपस्थित भदंत महापंथ,भदंत संघकीर्ती महाथेरो,भदंत शीलपंथ महाथेरो, प्रियदर्शनी महाथेरो, शिलरक्षित महाथेरो, सघानंद महाथेरो इत्यादी भिख्खू संघाला चिवरदान व वस्तुदान प्रदान करण्यात आले. यावेळी आयोजका तर्फे विभोर मुन यांच्या स्मृर्ती प्रित्यर्थ विहाराकरिता जागा उपलब्ध करून देणारे सुभाष मुन, ज्योत्स्ना मुन सह पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड, सहा.पोलीस आयुक्त अशोक बागुल,राजरत्न बन्सोड, सहा.पो.नि.प्राणेश भगत, माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे, श्याम मंडपे, राकेश मिश्रा, आशिष नंदागवळी इत्यादी सह राजकीय पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी सह पत्रकार यांनी समाजासाठी केलेल्या सकारात्मक सामाजिक कार्याचा गुणगौरव म्हणून पंचशील दुपट्टा,पुष्प,स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना पोलीस उपायुक्त अशोक बागुल यांनी तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचारात मानव कल्याण असल्याचे सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वांना समानतेच्या अधिकाराची प्राप्ती झाली असल्याचे सांगितले.प्रा.जोगेंद्र कवाडे,माजी आ.प्रकाश गजभिये व इतरही मान्यवरांनी यावेळी समायोजित मार्गदर्शन केले. तद्नंतर सुप्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे यांचा बुद्ध-आंबेडकरी गीतांचा भरदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात आलेल्या हजारो उपासक-उपासिकांसाठी भव्य भोजनदानाची व्यवस्था ही करण्यात आली होती. यशस्वीतेसाठी महाप्रज्ञा उपासिका संघाने अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपासक उपासिकांची उपस्थिती होती.यावेळी समता सैनिक दलाने सुरक्षेचा चोख बंदोबस्त केला होता.