– नागपूर फिल्म फेस्टिवल’चे चलचित्राचे अनावरण
– विजेत्यांना २ लाखांपर्यंत नगद पुरस्कार
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी नागपूर फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या फिल्म फेस्टिवलचे नागपुरात प्रथमच आयोजन होत असून विद्यापीठात फेस्टिवलच्या चलचित्राचे अनावरण शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी माननीय प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभा कक्षात आयोजित कार्यक्रमाला माननीय कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, कपिल शर्मा शोचे लेखक एकाग्र शर्मा, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य डॉ. किशोर इंगळे, विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्र संचालक डॉ. विजय खंडाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस असलेल्या १२ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ परिसरात होत आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये लघु फिल्म, डॉक्युमेंट्री, लहान मुलांकरिता, व्यावसायिक, कॅम्पस, रील, वर्टीकल, ॲनिमेशन आदी विविध श्रेणींमध्ये चित्रपट तयार करता येणार आहे. याकरिता महिला सशक्तिकरण, रोजगार सृजन, सामाजिक समरसता, पर्यावरण, भविष्यातील भारत, जनजातीय समाज, ग्रामीण विकास, लोक संस्कृती, जलवायू परिवर्तन, शौर्याच्या कथा, नैतिक कथा, नागरिकांची जबाबदारी, भारतीय कुटुंब प्रणाली, वोकल फाॅर लोकल, विकसित भारत, भारतीय ज्ञान परंपरा, विज्ञान आणि तंत्रज्ञान असे अनेक अन्य विषय या फेस्टिवलसाठी राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २ लाखांपर्यंत नगद पुरस्कार दिले जाणार आहे. स्पर्धेत व्यावसायिक गटात ५०० रुपये, विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये शुल्क राहणार आहे. चित्रपट पाठविण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२४ ही आहे. सभा कक्षात पार पडलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांनी अशा प्रकारचे फेस्टिवल नागपुरात प्रथमच होत असल्याने आयोजकांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. मनात आलेल्या कल्पनांना मूर्त रूप आणण्याचे काम आपण करीत असून मस्तीष्कात आलेले विचार उभे करण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे ते म्हणाले. नागपूरच्या इतिहासात या क्षणाची ऐतिहासिक नोंद होईल असे ते म्हणाले. कपिल शर्मा शो चे लेखक एकाग्र शर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले. चलचित्र फाउंडेशनच्या वतीने आयोजित फेस्टिवल प्रशंसनीय असून चांगल्या विषयाला जुळण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सिने क्षेत्रातील आलेले विविध अनुभव व्यक्त केले. महाराष्ट्र नसता तर देश नसता असे म्हणत या प्रकल्पाला यशस्वीता येईल, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, प्रसिद्ध सिने अभिनेता राजकुमार यांची आज १०० वी जयंती असल्याने चलचित्र अनावरण कार्यक्रम अवस्मरणीय ठरणार असल्याचे आयोजक जय गाला यांनी सांगितले. सभा कक्षात आयोजित कार्यक्रमाला जनसंवाद विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. प्रबास साहू, ललित कला व छंद मंदिर विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, आयोजन समितीचे सदस्य सर्वश्री अजय राजकारणे, महेंद्र पेंढारकर, अंशुल खंडेलवाल, विनय चहांदे, प्रवीण साहनी, सई देशपांडे, आस्था माने, जय गाला, ध्रुपद गाडे, हर्ष घरकाटे यांच्यासह अन्य उपस्थित होते.