एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
नागपूर :- शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके व त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकासाठी शेतक-यांनी २०२२-२३ या वर्षासाठी प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाडीबीटी पोर्टलवर (mahadbtmahait.gov.in) अर्ज करावेत किंवा कृषि कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक डॉ. रवींद्र भोसले यांनी केले आहे.
हे अर्थसहाय्य एकूण प्रकल्प बांधणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या साधारण आणि डोंगराळ व अधिसूचित क्षेत्रासाठी ३५ ते ५० टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमाननिहाय हे देय अनुदान राहणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल, फळे आदी बाबींची या योजनेंतर्गंत एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांची उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुगंधी मालाची साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढवणे तसेच मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजारमूल्य शेतक-यांना कमी मिळते. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी इ. प्रकल्पांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य दिले जाते, असेही भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.