संदीप कांबळे, कामठी
क्षितीज-२०२१-२२
कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी तसेच शांताबाई पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कामठी हे मध्य भारतातील औषधी निर्माण शास्त्र अभ्यासक्रमात शिक्षण देणारे अग्रगण्य महाविद्यालय आहे. शैक्षणिक तसेच संशोधनात्मक कार्यकरीता एक नामांकित संस्था असून सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता देखील संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे.
आपल्या सांस्कृतिक वारस्याचे जतन करीत दरवर्षी प्रमाणे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘क्षितीज’ चे आयोजन स्व वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाइन्स नागपुर येथे दिनांक ९ ते १० मे २०२२ पर्यंत करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन दि. ९ मे ला सकाळी ९.०० वाजता संस्थेच्या अध्यक्षा किशोरीताई भोयर यांच्या अध्यक्षतेखाली अरविंद कुमार, सेंटर हेड टीसीएस नागपूर, विजयानंद चक्रपाणी, साईट क्वालिटी हेड ल्युपीन लि.मी नागपूर, टी विजय कुमार, हेड एच.आर. ल्युपीन लि.मी नागपूर, कुलदिप राना, डिलेवरी सेंटर प्रोग्राम मॅनेजर टीसीएस नागपूर यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे सचिव सुरेश भोयर, संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, संचालक अनुराग भोयर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर, डॉ अतुल हेमके, विद्यार्थी परिषदेचे प्रमुख प्राध्यापक राधेश्याम लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येईल. यावेळी फार्मसी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रथमेश मत्ते, आर्या लांजेवार, ईश्वर बडवाईक, साक्षी काटरपवार उपस्थित राहतील.
याप्रसंगी ल्युपीन लिमी नागपूर यांच्यातर्फे अंतिम वर्षातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना कंपनीच्या उपस्थित अधिकारी मान्यवरांच्या हस्ते ल्युपीन स्काॅलर अवार्ड प्रदान करण्यात येईल. त्याचप्रमाणे यावर्षी पासून प्रथमच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व यादवरावजी भोयर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथम वर्षात प्रवेशित गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर यांच्या हस्ते अवार्ड प्रदान करण्यात येईल.
यावेळी महाविद्यालयाची स्मरणिका “डोपॅकझीन” चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. याव्यतिरिक्त दोन दिवसीय स्नेहसंमेलन’क्षितीज’अंतर्गत विद्यार्थ्यांद्वारे नाटक, वादविवाद स्पर्धा, नृत्य, गायन, प्रश्नमंजुषा, फॅशन शो, व्यक्तिमत्त्व स्पर्धा, मुकनाट्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. कार्यक्रमाचा समारोप दि. १० मे ला बक्षीस वितरणाद्वारे करण्यात येईल. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांच्या मार्गदर्शनात फार्मसी विद्यार्थी परिषद तसेच सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अथक प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशाने मागील २२ वर्षांपासून अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. औषधीनिर्माणशास्त्र सारख्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी यावेळी सांगितले.