संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दैनंदिन वापरातील वस्तूंच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खचले आहे. या महागाईच्या झळा सर्वसामान्य कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत सणावाराला गोड धोड करायचे असल्यास दहावेळा विचार करावा लागतो. आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. तर या दिवाळीच्या पश्वरभूमीवर राज्य शासनाने सणासुदीच्या दिवसात अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी शिधापत्रिकासाठी अवघ्या शंभर रुपयात चार वस्तूंचा संच मिळणार आहे त्यानुसार कामठी तालुक्यातील जवळपास 15 हजार कुटुंबीयांना धाण्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून दिली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी आत्महत्याग्रस्त ,एपीएल (शेतकरी)शिधापत्रिका धारकांना आगामी दिवाळी सनानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा,एक किलो हरभरा दाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार वस्तूंचा संच उपलब्ध करून मिळणार आहे. शासन उपलब्धतेनुसार व पुरवठ्यानुसार तात्काळ वाटप करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असून ई पॉस प्रणालीद्वारे सर्व लाभार्थ्यांपर्यंत वेळेत हे धान्य पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.