सामाजिक न्यायाची प्रतिपूर्ती करणारा अर्थसंकल्प : ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :- शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, विद्यार्थी या सर्वांच्या सर्वांगिण विकासाचे दूरदृष्टीकोन पुढे ठेवून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प ख-या अर्थाने सामाजिक न्यायाची प्रतिपूर्ती करणारा आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याला समर्पीत ‘मोदी आवास घरकुल योजना’ राज्यातील इतर मागासवर्गीयांचे हक्काचे घर पूर्ण करण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याशिवाय अनुसूचित जाती जमातीसाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेतंर्गत १ लक्ष ५० हजार घरकुले व त्त्यात मातंग बांधवांसाठी २५,००० घरकुले शोषित वंचितांसाठी महत्वाचा आधार ठरणार असल्याचा आनंद ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ, शिक्षण सेवक, कोतवाल, आशा सेविकांच्या मानधनात वाढ करून या सर्वांना न्याय देण्याचे मोठे कार्य वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश, केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत, एक रूपयामध्ये शेतक-यांचा पीक विमा व केंद्राच्या धर्तीवर प्रत्येक शेतकर्याच्या खातात वार्षिक ६ हजार रू ची रोख मदत अशा महत्वाच्या योजना महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी आधारस्तंभ म्हणून उभ्या राहून बळ देणार आहेत, असेही ॲड. मेश्राम म्हणाले.

अमृतकाळातील अर्थसंकल्पात पंचामृत नमूद करताना वित्तमंत्र्यांनी द्वितीय अमृत मांडताना महिला, आदिवासी, इतर मागासवर्गीयांसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासाची संकल्पना मांडली आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ, माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला २५ कोटी निधी अशी भरीव तरतूद समाजातील वंचितांना सन्मान प्रदान करणार आहे. आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना, धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना या तिनही योजना राज्यात सामाजिक न्यायाच्या वाटचालीला गती देणार आहेत, असा विश्वास ॲड. मेश्राम यांनी व्यक्त केला.

दादर, मुंबई येथे डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पुर्णत्वासाठीची भरीव तरतुद, भारतातील पहिली शाळा सुरू झालेल्या पुण्यातील भिडे वाड्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक युगानुयुगे ज्ञानाची ज्योत अधिक जोमाने प्रज्वलित राहणार असल्याची साक्ष देत राहणार आहे. अमरावती येथे रिपब्लिकन नेते रा सु गवई यांचे स्मारक, वाटेगाव येथे साकारले जाणारे लोकशाहीर अण्णाभाउ साठे स्मारक राज्यातील साहित्य संस्कृती आणि आंबेडकरी चळवळीला प्रेरणा देत राहील,असाही विश्वास प्रदेश प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com