नवी दिल्ली :- मानवी तस्करीच्या आव्हानांवर मात करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, राष्ट्रीय महिला आयोगाने आज रेल्वे संरक्षण दलासह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.या सहयोगी प्रयत्नांद्वारे, दोन्ही संस्थांनी भारतीय रेल्वेच्या परिघातील महिला तस्करीच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना संवेदनशील बनवण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे.
राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल्वे संरक्षण दल यांनी एकत्रित येऊन भारतभर मानवी तस्करी रोखण्यासाठी प्रयत्नांना बळकटी देण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा सामंजस्य करार केला.या सामंजस्य करारावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या सहसचिव ए आशोली चालाई आणि रेल्वे संरक्षण दलाचे महानिरीक्षक सर्वप्रिया मयंक यांनी स्वाक्षरी केली.हा करार विशेषत: भारतीय रेल्वेच्या विस्तृत जाळ्यामध्ये मानवी तस्करीच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी दोन्ही संघटनांची वचनबद्धता अधोरेखित करतो.
तस्करीला बळीं पडलेल्यांपैकी 70% महिला आहेत हे समोर आणणाऱ्या चिंताजनक आकडेवारीला प्रतिसाद म्हणून,समाजातील सर्वात असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कारवाईची तातडीची गरज अधोरेखित करण्याच्या दृष्टीने, हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने 2 एप्रिल, 2022 रोजी मानवी तस्करी विरोधी कक्षाची स्थापना केली,असून महिलांच्या तस्करीशी लढा देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला सोबत यापूर्वीपासूनच कार्यरत आहे .
या सामंजस्य कराराच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि तस्करी झालेल्या महिलांची सुटका करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांचा समावेश आहे.यामध्ये रेलवे संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची जागरूकता वाढवण्यासाठी आणि मानवी तस्करीच्या घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी जागरूकता कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, मानवी तस्करीच्या लक्षणांबद्दल आणि अशा प्रकरणांची प्रभावीपणे तक्रार कशी करावी याबद्दल त्यांना शिक्षित करण्यासाठी आघाडीवर कार्यरत रेल्वे कर्मचारी आणि सामान्य लोकांवर लक्ष केंद्रित करून जागरूकता मोहिमा सुरू केल्या जातील.