नागपूर :- देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही. अशा महत्त्वाच्या मुद्दयांकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून राम मंदिराच्या विषयाला महत्त्व देत आहे. मंदिराचे भजन घेऊनच भाजप सरकार निवडणुकांना पुढे जाईल. परंतु, या आमिषाला बळी नका, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. खरगे यांनी मराठीतून भाषण केले. काँग्रेसच्या १३९व्या स्थापनादिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानावर सभा झाली.
खरगे म्हणाले की, नागपूरमध्ये एका बाजूला दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. तर याच नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थळही आहे. पंतप्रधान मोदी हे संघाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. संघ या देशाचे वाटोळे करू पाहत आहे. संघाचे विचार जपणाऱ्या भाजप सरकारला जर आपण रोखू शकलो नाही तर देशातील लोकशाही उद्ध्वस्त होईल. संविधानाने महिला, गरीब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजप देऊ शकत नाही असा दावा खरगे यांनी केला.
मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण अधिवेशन सुरू असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे मंजूर करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपला धडा शिकवा असे आवाहन खरगे यांनी केले. सूत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले, तर आभार विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी मानले.