– नमाद महाविद्यालयात लोकशाही दशा व दिशा वर व्याख्यानमाला
गोंदिया :- देशाच्या सत्तास्थानी येणारे कोणतेही राजकीय पक्षाचे सरकार हे सगळ्या व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करते. आपण सरकारवर टीका करतो, हे आपले कर्तव्य आहे. परंतु केवळ टीका केल्याने व्यवस्था परिवर्तन होत नाही वा लोकशाहीचे संरक्षण होत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. लोकशाही रक्षणाची आणि त्यासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी ही युवकांची आहे. त्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात आयोजित लोकशाहीची दशा व दिशा या विषयावर आयोजित विद्यार्थी व्याख्यान मालिकेच्या समारोप प्रसंगी डॉ. महाजन बोलत होत्या. संस्था मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वाखाली एमए राज्यशास्त्राच्या नवागत विध्यार्थ्यांचे स्वागत आणि व्याख्यानमाला या दोन दिवसीय कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्या डॉ. शारदा महाजन, डॉ. अर्चना जैन, डॉ. एस यु खान, प्रा. सिद्धार्थ रामटेके, अधीक्षक मोरेश्वर देशभ्रतार, डॉ. एच पी पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, डॉ. परवीन कुमार, प्रा. योगेश भोयर, डॉ. अंबादास बाकरे, डॉ. मस्तान शाह, प्रा. घनशाम गेडेकर, प्रा. प्रणव वासनिक उपस्थित होते. नवागताच्या स्वागत कार्यक्रमात गीत, नृत्य, नाटिका, कथा आदी कार्यक्रम घेण्यात आले. सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट पुरस्काराकरिता निवड झालेल्या निखिल बनसोड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकशाहीची दशा व दिशा या विषयाअंतर्गत मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यामधील संबंध, विरोधी पक्षाचे महत्व, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका, निवडणूक आयोगाची जबाबदारी, प्रादेशिक पक्षांचे महत्व, माध्यमांची भूमिका, राष्ट्रपतीची भूमिका, पक्षांतर बंदी कायदा आणि वर्तमान आदी विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांनी संवैधानिक संस्थाचा दुरुपयोग, माध्यमांची ढासळती विश्वासाहर्ता, विरोधी पक्षांचा ऱ्हास, निवडणूक आयोगाची शंकास्पद भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या सरंक्षणासोबतच प्रलंबित खटले तात्काळ निकाली काढण्या विषयी मत मांडले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ. महाजन म्हणाल्या, सरकारवर टीका करणे सोपे असते, परंतु जबाबदारीचे निर्वाहन करणे कठीण असते. आपल्याला लोकशाहीचे संरक्षण करायचे असेल आणि घटनादत्त व्यवस्था कायम ठेवायच्या असतील तर युवकांनी पुढाकार घेतल्या शिवाय पर्याय नाही, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री खोब्रागडे, प्रास्ताविक डॉ. शशिकांत चौरे तर आभार अंकेश रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.